युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया (नवशक्ती)

युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया

बॉम्ब वर्षाव, मृत्यूचे तांडव, भयाची दहशत, क्रूरतेची छाया अशा अत्यंत भयावह स्थितीत असलेला पश्चिम आशिया आणखीनच अस्वस्थ झाला आहे. इस्त्राईलच्या गाझावरील हल्ल्यांनी माणुसकीला पार काळीमा फासली आहे. त्यात आता इस्त्राईलने इराणवर हल्ले चढविले आहेत. हे सारे विनाशकाले विपरीत बुद्धि असेच आहे.

भावेश ब्राह्मणकर

अन्नाची पाकीटे घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धावणारे चिमुकले, वृद्ध, महिला अशा साऱ्यांवरच धाडकन बॉम्ब पडतो... कानठळ्या बसवणारा स्फोट होतो... क्षणार्धात सारेच उध्वस्त होते... नियतीच्या दुष्टचक्रामुळे हे सारे घडते आहे का? असा विचार करणाऱ्यांना हे कुठे ठाऊक आहे की, बेंजामिन नेतन्याहू सारख्या क्रूरकर्म्याचा थयथयाट सुरू आहे! युद्धोतिहासात आजवर हिटलरच्या अनेक निष्ठूर कहाण्या सांगितल्या जातात. मात्र, इस्राईलचे नेतृत्व करणाऱ्या नेतन्याहू यांनी मानवाधिकारांसह अनेक आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे सर्रास उल्लंघन करीत शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, जगातील १९४ देशांच्या डोळ्यादेखत हे घडते आहे. या सर्व देशातील प्रमुख, नेते, जनता हे सारेच हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गपगुमान पाहत आहेत. हे सारे कमी म्हणून की काय आता नेतन्याहू यांनी थेट इराणवर हल्ला चढविला आहे. त्यामुळे जगभरात एकच हलकल्लोळ उडाला आहे.

इस्त्राईल किंवा नेतन्याहू यांच्या खुमखुमी किंवा मनमानीपणाला मुख्य पाठिंबा आहे तो अमेरिकेचा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तारुढ होण्यापूर्वी डांगोरा पिटत होते की, ते शांततेचे पाईक आहेत. रशिया-युक्रेन, इस्राईल-गाझा ही युद्धे क्षणार्धात थांबविण्याची वल्गनाही त्यांनी केली. प्रत्यक्षात त्यास त्यांना कुठलेही यश आलेले नाही. याउलट इस्त्राईल-इराण युद्ध सुरू झाल्याने सारेच फासे उलटे पडत आहेत. किंबहुना ट्रम्प यांची तशी इच्छा आहे, असेच म्हणणे योग्य ठरेल. पश्चिम आशियाने यापूर्वी अरब-इस्राईल हा संघर्ष पाहिला आहे. यामुळे तिसरे महायुद्ध पेटते की काय अशी परीस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने ती निवळली. आता पुन्हा अशाच प्रकारचे वातावरण तयार होते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

जगभरातील ज्यू धर्मीयांनी आपला स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी आग्रह धरला. त्यातूनच इस्त्राईलची रक्तरंजित संघर्षाने निर्मिती झाली. दुसरे महायुद्ध आणि त्याच्या पश्चात हे सारे घडले. मात्र, मूळ रहिवाशांना हुसकावून लावत त्या जागी स्वतःला प्रस्थापित करणे आणि त्यानंतर तेथे हुकुम गाजवण्याचे प्रकार घडले. यातूनच पश्चिम आशियाच्या शांततेला दृष्ट लागली. परिणामी, इस्त्राईलचा पॅलेस्टाईन, गाझा, इजिप्त, जॉर्डन, सिरीया, इराक, लेबऩॉन, इराण अशा विविध देशांशी सातत्याने संघर्ष राहिला आहे. या संघर्षास वांशिकतेचाही लवलेश आहे. अरब राष्ट्रे आणि मुस्लिम धर्मीय विरुद्ध ज्यू अशा संघर्षाची किनार त्यास आहे. वांशिक युद्ध हे अतिशय भयानक असते. आजवरचा इतिहास तेच सांगत आला आहे. त्यामुळे आता पुन्हा तसा संघर्ष उभा राहणे हे जगाच्या हिताचे नाही, याची जाणिव इस्त्राईल आणि अमेरिकेसह सर्वच देशांनी ठेवणे गरजेचे आहे. मात्र, इस्त्राईल आणि अमेरिका यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे गैर आहे.

इस्त्राईलकडून गाझा पट्ट्यामध्ये हजारो बळी घेतले जात आहेत. युद्ध आणि संघर्षाची एवढी भीषण दहशत तिथे आहे की जे आता केवळ जगत आहेत, त्यांचे सुद्धा नजिकच्या काळात प्राण जाणार आहेत. अन्न, औषधे, उपचार यासह गरजेच्या वस्तूंचा नितांत तुटवडा तेथे आहे. इस्त्राईलकडून नागरी वस्त्यांवर दररोज दिवसा किंवा रात्री केव्हाही हल्ले केले जात आहेत. गाझा आणि पॅलेस्टाईन परिसरात असा एकही भाग नाही की जेथे हल्ल्याची शक्यता उरलेली नाही. संयुक्त राष्ट्रासह विविध संस्थांनी अहवालांमधून तेथील अनन्वित अत्याचार आणि क्रूरतेची मांडणी जगासमोर केली आहे. हे आकडे किंवा त्याचे वृत्त जगभर प्रसिद्ध केले जात आहे. प्रत्यक्षात इस्त्राईलने अमानुषपणे हल्ल्यांचा हा ससेमिरा थांबवावा, यासाठी जगभरातून दबाव निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र, महासत्ता असलेल्या अमेरिकेचा इस्त्राईलला असलेला भक्कम पाठिंबाच अनेकांना मूग गिळून गप्प बसण्यास कारणीभूत ठरतो आहे. अमेरिकेला शिंगावर घेण्याची क्षमता असलेला रशियाच सध्या युक्रेन सोबतच्या युद्धात जायबंदी आहे. त्यामुळेच अमेरिका आणि इस्त्राईल यांचे फावते आहे. यात मात्र, निष्पाप जनतेचा बळी शेकडोच्या संख्येने जात आहे.

इराण हा देश अण्वस्त्रे तयार करीत असल्याची वदंता थेट ८०च्या दशकापासून सुरू आहे. वारंवार तो नाकारण्याचा आणि तसे काही नसल्याचे अहवाल प्रसृत झाले आहेत. असे असताना इराणचा हा अणू कार्यक्रम इस्त्राईलसाठी धोकादायक असल्याचे सांगत इराणवर हल्ले सुरू करण्यात आले आहेत. वास्तवतः इराण आणि इस्त्राईल यांची सीमा काही एकमेकाला लागून नाही. तरीही इस्त्राईलला इराणपासून असा धोका का वाटावा? आणि त्यांनाच तो का असावा? इराणच्या मानवी वस्तींसह महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागून इस्त्राइलने रणशिंग फुंकले आहे. इराणनेही त्यास जोरदार प्रत्युत्तर सुरू केले आहे. अमेरिकेने मिठाची गुळणी तोंडात धरल्याने इस्त्राईलचे फावते आहे. अधिकाधिक आक्रमक आणि विध्वंसकारी हल्ला करुन इराणचा अणू कार्यक्रम हाणून पाडण्याचा इस्त्राईलचा डाव असला तरी तो यशस्वी होण्याची सुतराम शक्यता नाही. मुळात नेतन्याहू यांचीच खुर्ची अस्थिर आहे. देशांतर्गत जनता आणि राजकीय नेत्यांच्या मनातूनही ते उतरले आहेत. हीच संधी साधून युद्धाचा अवतार घेणे नेतन्याहू यांना सोयीचे वाटले आहे. यातून मात्र मानव जातीचे मोठे नुकसान होत आहे. मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन घडते आहे.

इस्त्राईल-इराण युद्धाचा परिणाम जगाच्या पाठीवर विविध प्रकारे होत आहे. इराण हा तेल उत्पादक व पुरवठादार देशांचा सदस्य आहे. भारत आणि इराण हे मित्र आहेत. इराणकडून भारताला रास्त दरात, भारतीय रुपयात आणि उधारीने तेल मिळते. अमेरिकेने इराणवर असंख्य निर्बंध लादले असले तरी तेलाचा हुकमी एक्का त्यांच्याकडे आहे. अनेक देशांना इराणकडून तेलाचा पुरवठा होतो. शिवाय इराणलगतच्या समुद्र आणि खाडीतून जगाचा तेल व्यापार, मालवाहतूक होते. इस्त्राईलच्या हल्ल्यांमुळे ही वाहतूकही अडचणीत आली आहे. पहिल्या झटक्यात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. आगामी काळात ते आणखी वाढू शकतात. यातून देशोदेशी महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. भारतही या संकटातून वाचू शकणार नाही. म्हणजेच, इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट आणि अप्रत्यक्ष फटका अनेक देशांना बसणार आहे. असे असतानाही हे युद्ध थांबावे यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. मुजोरी करणाऱ्या इस्त्राईल किंवा त्यास पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेवर काहीही दबाव निर्माण होत नाही. यामुळेच इस्त्राईलची मनमानी वाढत आहे.

इस्त्राईलला वेसण घालण्यात जगातील १९४ देशांना अपयश येणे हे अनेक समस्यांना जन्म देणारे आहे. तसेच, आपले कुणी वाकडे करुन घेत नाही या खुमखुमीलाही बळ देणारे आहे. यातूनच चीन हा तैवानचा घास घेण्यासाठी सरसावू शकतो. सार्वभौमत्व धोक्यात येणे हे कुठल्याही देशासाठी आव्हानात्मकच. तसेच, त्याचे रक्षण करण्यात अन्य देशांकडून जाणिवपूर्वक अडथळे आणणे हे सुद्धा घातक आहे. त्यामुळे सारासार विचार करता कुठल्याही सार्वभौम देशावर अचानक आणि हिंसक हल्ला करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत केवळ चिंता व्यक्त होते. अशा कृत्यांना वेसण घालण्यासाठीच संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली असली तरी ही संस्था दुबळी असल्याचे प्रतीत होत आहे. दुसऱ्या देशावर आक्रमण करणे म्हणजे स्वतःचा देश सुरक्षित ठेवणे हा प्रघात रुजणे हा मानवी अस्तित्व अधिकाधिक धोक्यात जात असल्याचे संकेत आहेत. इस्त्राईलने आपल्या कृतीतून त्याची ठळक जाणिव संपूर्ण जगाला करुन दिली आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

West Asia, War, Middle East, Israel, Iran, Gaza, Conflict, Security, Defence, America, USA


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)