भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान की? (सामना उत्सव पुरवणी)
भारतीय महिलेचा चीनच्या विमानतळावर तब्बल १८ तास छळ केला गेला. शिवाय अरुणाचल प्रदेश आमचाच असल्याचा दावा करून चीनने भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान दिले आहे. इतिहास आणि नजिकच्या काळात घडलेल्या घटना पाहता भारताने ही बाब अतिशय गांभिर्याने घ्यायला हवी. भावेश ब्राह्मणकर अरुणाचल प्रदेशात जन्मलेली पेमा वाँगजोंग थोंगडोक ही महिला सध्या यूकेमध्ये वास्तव्यास आहे. पेमा ही लंडनहून जपानला जात असताना शांघायच्या पुदोंग विमानतळावर तिचा ट्रान्झिट होता. कागदपत्रे , व्हिसा , तिकीट तिच्याकडे असतानाही विमानतळावरील अधिकाऱ्यांनी भारतीय पासपोर्ट अवैध असल्याचे सांगत तिला रोखून धरले. पेमा यांनी सोशल मिडियात व्हिडिओ पोस्ट करून यास वाचा फोडली. "तू अरुणाचल प्रदेशात जन्मली आहेस , म्हणजे तू चीनची नागरिक आहेस. भारतीय पासपोर्ट वैध नाही, असे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे होते", असे व्हिडिओत त्यांनी स्पष्ट केले. तसे पाहता हा युक्तिवाद केवळ तथ्यहीन नव्हे तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व मान्य पद्धतींना डावलणारा आहे. पेमा यांना पुढील फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली. जवळपास १८ तास त्यांना विमान...