अस्थिर पाकिस्तान फुटीच्या मार्गावर? (नवशक्ती)
अस्थिर पाकिस्तान फुटीच्या मार्गावर?
बलुचिस्तान प्रांतात रेल्वेचे अपहरण आणि त्यानंतर पाक लष्करावर झालेला जबर हल्ला यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत कलह, अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दारिद्र्य आणि असंख्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानचे विघटन होणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भावेश ब्राह्मणकर
महागाई, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण,
पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव, अस्वच्छता या आणि अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेल्या
पाकिस्तानमध्ये दोन मोठे हल्ले झाले आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण जगाचे लक्ष
पाककडे वळले आहे. पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात हे हल्ले झाले
आहेत. इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेला बलुचिस्तान हा प्रांत वाळवंटी आणि अत्यल्प
सोयी-सुविधा असलेला आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने सर्वप्रथम
रेल्वेचे अपहरण केले. त्यानंतर पाक लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या दोन्ही घटना
अतिशय महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. शिवाय इतिहास काय सांगतो ते
सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे या सर्वाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.
भारत आणि पाकिस्तान हे देश स्वतंत्र झाले
त्यावेळी बलुच हा प्रांत पाकिस्तानात समाविष्ट होण्यास तयार नव्हता. त्यांना स्वतंत्र
रहायचे होते. तर काही जाणकारांच्या मते बलुच प्रांताला भारतात सामील व्हायचे होते.
मात्र, बलुच भागातील नागरिकांची मानसिकता, त्यांच्या इच्छा, भविष्यासाठीच्या
त्यांच्या योजना यांचा सारासार विचार न करता पाकिस्तानने लष्करी कारवाईद्वारे बलुच
प्रांत विलीन करुन घेतला. सहाजिकच तेव्हापासून म्हणजेच १९४७ सालापासून बलुच
प्रांतातील नागरिक हे असमाधानी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे धुमसत आहेत. त्यातच
हा प्रदेश वाळवंटी आहे. परिणामी, या भागाकडे पाकिस्तानने फारसे लक्ष दिलेले नाही.
त्यामुळेच या भागात पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे घट्ट नाही. शिक्षण, आरोग्य यासह
अन्य मूलभूत सेवाही येथे मिळत नाहीत. पाकिस्तानी राज्यकर्ते जाणिवपूर्वक बलुच
प्रांताला अन्यायकारक वागणूक देतात, असा ठाम समज तेथील नागरिकांचा आहे. ही बाब
तेथे बंडखोर गट स्थापन होण्यास कारणीभूत ठरली. वर उल्लेख केलेली संघटना ही
त्यापैकीच एक. बलुच प्रांतात गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, महागाई अशा विविध समस्यांची
तीव्रता पाकिस्तानातील अन्य प्रदेशांपेक्षा अधिक आहे. सहाजिकच सुजाण आणि आक्रमक
बलुच नागरिक हे विविध सरकारी आकडेवारी आणि माहितीची कागदपत्रे सोशल मिडियाच्या
माध्यमातून जगासमोर आणत असतात. यातून पाकच्या सापत्न वागणुकीचे दाखलेही मिळतात. मात्र,
या बंडखोरांना दाबून टाकल्याने सर्व काही ठीक होईल असा होरा पाकिस्तानी सत्ताधारी
आणि लष्कराचा आहे. परंतु, विज्ञानाचा नियम काय सांगतो त्याकडेही पहायला हवे. स्प्रिंगसारखी
एखादी वस्तू दाबली तर तिच्यावरील दबाव सोडल्यानंतर ती आधीपेक्षा अधिक मोठी होते
किंवा उसळी घेते. बलुचिस्तानात सध्या तसेच घडते आहे.
जाफरा एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए)
केलेला हल्ला आणि अपहरण हे काही एका रात्रीतून घडलेले नाही. त्यामागे अत्यंत सुनियोजित
तसेच अचूक अशी रणनिती आहे. हे अपहरण कसे घडले, त्यात किती जण मारले गेले यासह अन्य
बाबींचे वृत्त प्रसारीत झाले आहे. मात्र, पाक लष्कराला रेल्वेपर्यंत सहज पोहचता
येऊ नये, अशा ठिकाणाची निवड बीएलएने केली होती. तसेच, बीएलएने या अपहरण आणि अन्य
स्वरुपाचे जे व्हिडिओ प्रसारित केले त्यावरुन कितीतरी बाबी स्पष्ट होत आहे. याउलट
पाककडून दिल्या जाणाऱ्या माहितीचे समर्थन करणारे अधिकृत व्हिडिओ किंवा फोटो
प्रसारीत झालेले नाहीत. त्यामुळे या अपहरणात बीएलएला अधिक यश मिळाल्याचे सांगितले
जाते. तसेच, या अपहरणनाट्याला काही दिवस उलटत नाही तोच बीएलएने पाक लष्कराच्या
वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात पाक लष्कराचे जवळपास ९० जवान ठार झाल्याचे
सांगितले जाते. अर्थात पाकने हे फेटाळून लावले आहे. मात्र, नक्की किती सैनिक ठार
झाले ते सुद्धा जाहीर केलेले नाही. यावरुन संशयाला प्रचंड वाव आहे.
अत्यंत कमी कालावधीत झालेले हे दोन आघात पाकिस्तान
सरकार आणि लष्कर यांचे वाभाडे काढणार आहे. मुस्कटदाबी करुन राज्य चालविता येत नाही
आणि असंतोषाचा स्फोट होतोच हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुळात पाक सरकार आणि
लष्कर यांना बलुच प्रांतात फारसे स्वारस्य नाही, असे बोलले जाते. वास्तविक पश्चिमेकडील
हा प्रांत इराण आणि अफगाणिस्तान यांना जोडणारा आहे. त्याकडे जर दुर्लक्ष होत असेल
तर देशाच्या सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी ती अधिक गंभीर बाब म्हणावी लागेल.
अमेरिकन शस्त्रास्त्रे आणि अर्थसहाय्याच्या बळावर आतापर्यंत तगलेले पाकिस्तान आता
प्रचंड अडचणीत सापडले आहे. कारण, अमेरिकेने सर्व रसद थांबविण्याचे निश्चित केले
आहे. ही बाब लक्षात घेत पाकने चीनला अधिक जवळ करण्यासाठी धडपड चालवली आहे. मात्र,
चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पाकमध्ये केलेली
गुंतवणूक फारशी फलद्रुप ठरत नसल्याचे लक्षात घेताच स्थगितीचे हत्यार उपसले आहे. ग्वादार
बंदराच्या ठिकाणी चीनने कोट्यवधी रुपये ओतले आहेत. आणि याच परिसरात बलुच बंडखोर
सक्रीय आहेत. त्यांचा बिमोड करणे पाक लष्कराला अद्याप शक्य झालेले नाही. त्यातच
बलुच बंडखोरांनी चिनी अभियंत्यांवर हल्ले केले. त्यांना ठार केले. हे चीनच्या
जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांना चीन दौऱ्यात खडेबोल
ऐकावे लागले होते. आता बलुच बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी चीनने लष्करी मदत करावी,
अशी विनंती पाकने केल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर पाक लष्कराची नाचक्की तर
होईलच पण चीन त्याबदल्यात पाककडून काय वसूल करेल हे सांगता येत नाही. कदाचित बलुच
प्रांतावर चीन कब्जा मिळवू शकतो. त्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळण्याची चिन्हे आहेत.
पाकिस्तानी राज्यकर्ते आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी
यांचे मनसुबे हे देशहिताचे कधी असतात असा प्रश्न पाकमधील जाणकार विचारत आहेत. लष्कराला
आपल्या हातचे बाहुले असलेले सरकार हवे आहे तर राज्यकर्त्यांना देशाऐवजी स्वतःचा
स्वार्थ साधण्याचे पडलेले आहे, अशा प्रकारचे थेट भाष्य करणाऱ्या पोस्ट आता सोशल
मिडियात पाक नागरिकांकडून टाकल्या जात आहेत. पाकव्याप्त काश्मीर असो की खैबर
पख्तुनवा येथेही आलबेल नाही. शिवाय ज्या दहशतवादी संघटनांना पाकने आजवर बळ दिले
तेच आता त्यांच्या उराला लक्ष्य करण्याची चिन्हे आहेत. तालिबानचे उदाहरण तर
सर्वांसमोरच आहे. ठिकठिकाणी होणारे बॉम्ब हल्ले नित्याचेच झाले आहेत. तर, बंडखोर
गटांनी पाकिस्तानच्या अतंर्गत सुरक्षेला मोठे भगदाड पाडल्याचे सांगितले जाते. हे
जर खरे असेल तर पाकिस्तान फुटीच्या त्या ठिणग्या ठरण्याची शक्यता नाकारता येत
नाही. बलुच बंडखोरांनी आक्रमक हल्ले करुन त्यास प्रारंभ केला असे म्हणता येईल. बलुच
बंडखोरांना भारताची फूस आहे किंवा भारत हे घडवून आणतो आहे, असा आरोप पाक करीत असला
तरी त्याचे कुठलेही पुरावे जाहीर केलेले नाही. बंडखोरांचा बिमोड करण्याची मानसिक
तयारीही पाक लष्कर आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे आगामी काळ पाकसाठी अतिशय
कठीण राहण्याची शक्यता आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे काय पडसाद उमटतात
ते सुद्धा महत्वाचे आहे. पाकिस्तानातील या सर्व बाबींकडे भारताला डोळ्यात तेल
घालून लक्ष ठेवावे लागेल. कारण, त्याचा परिणाम भारतावरही येनकेन प्रकारे होणारच
आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
भावेश छान लेख ...
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery well studied information
उत्तर द्याहटवाखुप खुप आभार
हटवाभावेश,अतिशय अभ्यासपूर्ण व पाकिस्तानातील वास्तव परिस्थिती उघड करणारा लेख...
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवा