पाम तेल घ्या आणि.... माकडांबाबत मलेशियाच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा (अक्षरनामा)
पाम तेल घ्या आणि.... माकडांबाबत मलेशियाच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा
राजकारण, शह, काटशह, कुरघोडी, भेटवस्तू, आमंत्रण, शाही मेजवानी या आणि अशा कितीतरी बाबींचा समावेश परराष्ट्र धोरणात होतो. मात्र, यामध्ये प्राण्यांचेही महत्व मोठे आहे असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरे आहे. मलेशियाने तेथील माकडांबाबत घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे त्याची जगभर चर्चा सुरू झाली आहे.
भावेश ब्राह्मणकर
दोन देशांचे संबंध सुधारावेत म्हणून
क्रीडा स्पर्धांचे आयोजन, नेत्यांच्या
गाठी-भेटी, शिष्टमंडळांचे दौरे, सांस्कृतिक
कार्यक्रम यासारखे विविध प्रकारचे फंडे वापरले जातात. मात्र, हरिण, बकरी घ्या आणि त्याच्या बदल्यात पांडा द्या
असे कुणी सांगितले तर? किंवा पाम तेल खरेदी करा आणि माकड भेट
घ्या अशी ऑफर मिळाली तर? हे तुम्हाला नक्कीच विश्वासार्ह
वाटणार नाही. पण, ही बाब खरी आहे. दोन देशात सौहार्दाचे
वातावरण निर्माण व्हावे, त्यांच्या संबंधांना बळकटी मिळावी
म्हणून परराष्ट्र धोरणात पक्षी, प्राण्यांच्या आदान
प्रदानाला विशेष महत्त्व आहे. मलेशिया सरकारने तेथील ओरंगुटन माकडांबाबत घेतलेला
निर्णय सर्वप्रथम वाद आणि टीकेचा धनी झाला असला तरी आता नव्या निर्णयाचे जगभर
स्वागतच होत आहे.
पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती,
जलचर, कीटक या जैविक विविधतेच्या जोरावरच
त्या-त्या देशाचे किंवा प्रदेशाचे वैभव वाढीस लागते. नैसर्गिक आणि पर्यावरणीय
संपन्नतेमुळेच अनेक देश जगाच्या पाठीवर नावलौकीक बाळगून आहेत. या नैसर्गिक वारसा
आणि वैभवाचा वापर शेजारच्या देशाशी असलेल्या संबंधांच्या वाढीसाठी करण्याची प्रथा
तशी जुनीच आहे. दोन्ही देश विलग होतात ते केवळ भौगोलिकदृष्ट्या. पण त्या भागातील
किंवा प्रदेशातील पर्यावरणाला, निसर्गाला कसलेही बंधन राहत
नाही. एकाच स्वरुपाच्या किंवा पद्धतीच्या वातावरणात विविध प्रकारची जैवविविधता
वाढत असते, बहरत असते. मात्र, काळाच्या
ओघात अनेक कारणांमुळे या जैविक विविधतेतील काही घटक धोक्यात येतात, काही निखळतात, काही दुर्मिळ बनतात, तर काहींच्या खुणाच अस्पष्ट बनतात. ही बाब लक्षात घेता नैसर्गिक संतुलन
टिकून रहावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज भासते. यातूनच अनेक संकल्पना जन्माला
येतात. त्यातीलच एक म्हणजे, पक्षी, प्राण्यांचे
आदान-प्रदान.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख, दबदबा, प्रतिष्ठा आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी
त्या-त्या देशांचे परराष्ट्र खाते विशेषरित्या कार्यरत असते. या खात्याच्या
माध्यमातूनच तो देश आपले अनेक हेतू साध्य करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असतो.
प्रत्येक देश त्याची संस्कृती, प्रथा-परंपरा, इतिहास, नागरिक, त्यांचे
जीवनशैली, आचार-विचार आदींना अनुसरुनच परराष्ट्र धोरण तयार
करतो. त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो. त्यातच शेजारील देशांशी आपले संबंध
सलोख्याचे रहावेत यासाठी अनेकदा दिखावा केला जातो तर बहुतांशी वेळा जाणिवपुर्वक
प्रयत्न केले जातात. जागतिकीकरणाच्या आणि आजच्या आधुनिक युगात तर बहुआयामी
स्वरुपाचे धोरण अवलंबून अनेक देश आपापली प्रतिष्ठा जपण्याचा आणि वाढविण्याचा
प्रयत्न करीत आहेत. या आधुनिकतेला पर्यावरणीय घटकांची लाभणारी जोड एक वेगळेच
समीकरण निर्माण करणारी आहे. इतिहासात डोकावले असता काही दाखले ही बाब स्पष्ट
करतात.
१९४९ साली चीनमध्ये क्रांती झाली.
त्याचवेळी तैवान सोबत चीनचे वितुष्ट निर्माण झाले. चीनने अत्यंत चलाखपणे तैवानच्या
सार्वभौमत्वावर दावा सांगत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. महासत्ता
होण्याच्या ध्यासातून तैवानचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याची टिका तैवानने केली
आणि प्रखर विरोधही. दोन्ही देशांच्या ताठर भूमिका आणि वादावादी यामुळे उभय राष्ट्रातील
संबंधात मोठीच कटुता निर्माण झाली. आजतागायत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दोन्ही
देशांमधील संबंध ताणलेलेच आहेत. ते चांगले होण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाले. चीनने
२०११ मध्ये जिव्हाळ्याच्या पर्यावरणाला साद घातली. हरिण आणि बकरींची संख्या चीनमध्ये
लक्षणीयरित्या रोडावल्याने त्यांची आयात करुन त्याच्या बदल्यात तैवानला पांडा
निर्यात करावे, अशी संकल्पना चीनच्या परराष्ट्र
विभागाने तयार केली. चिनी राष्ट्राध्यक्षांच्या परवानगीनंतर तसा प्रस्ताव तैवानी
परराष्ट्र खात्याला धाडण्यात आला. ताणलेल्या राजकीय संबंधात सौहार्द निर्माण
करण्याचा हा यत्न दोन्ही देशांनी मनापासून स्विकारला आणि या प्राण्यांचे आदान-प्रदान
झाले. ‘हरिण, बकरी घ्या-पांडा द्या’
या धोरणात जेवढी मुत्सुद्देगिरी होती तेवढीच पर्यावरणाच्या
संवर्धनासाठीची तळमळ. आंतरराष्ट्रीय पातळीवरच या धोरण आणि संकल्पनेचे कौतुक करुन
भविष्यात अशा प्रकारचे प्रयत्न होण्याची गरज अनेक पर्यावरण परिषदांमध्ये व्यक्त
करण्यात आली.
कटुतेमुळे सदैव चर्चेत असलेल्या भारत
आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक बळकटी यावी यासाठी पंजाब
सरकारने एक नामी युक्ती वापरण्याचे ठरविले आहे. पंजाबच्या पक्षी संग्रहालयात
बहुविध प्रकारचे पक्षी असून ते लाहोरला पाठविण्याचा आणि लाहोरच्या पक्षी संग्रहालयातील
पक्षी आणि प्राणी भारतात आणण्याचा पंजाब सरकारचा मानस होता. पंजाबचे तत्कालिन
मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीच हा प्रस्ताव ठेवला. बादल यांच्या
अध्यक्षतेखालील पंजाब राज्य वन्यजीव बोर्डाने या प्रस्तावास मान्यता दिली. पंजाबच्या
वन्यजीव विभागाचे शिष्टमंडळ लाहोरला जाऊन तेथील प्राणी संग्रहालयाच्या
व्यवस्थापनाशी चर्चा करेल, पक्षी आणि प्राण्यांच्या या आदान-प्रदानाला
पाकिस्तानकडूनही सकारात्मक प्रतिसाद लाभेल, असे पंजाब सरकारला आशावाद होता. बाज या राज्य पक्षाची संख्या पंजाबमध्ये
रोडावत चालली असून पाकिस्तानच्या भूभागावर या पक्ष्याची संख्या बऱ्यापैकी आहे.
त्यामुळे बाज पक्षाबरोबरच पांढरा मोर, ब्लॅक शोल्डर, मोर, हिरवा जावा मोर, बटेर,
काळे तीतर या पक्ष्यांनाही भारतीय भूमीत आणणे आणि याबदल्यात
भारतातून सांभर, हरिण, काळवीट तसेच
काही प्रकारच्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाकिस्तानाला देण्याची पंजाब सरकारची
तयारी होती. या प्रयत्नातून भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांना नवा आयाम प्राप्त
होण्याबरोबरच सदभावनाही वाढीस लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र,
प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही.
आताही मलेशियाने एक महत्वपूर्ण निर्णय
घेतला आहे. मलेशिया हा जगातील पाम तेलाच्या उत्पादक देशांपैकी प्रमुख आहे. मलेशियाकडून
जे देश पाम तेल खरेदी करतील त्यांना ओरंगुटान हे माकड भेट देण्याचे धोरण मलेशियन
सरकारने स्वीकारले. त्याची जगभर चर्चा झाली. देशोदेशी हे माकड पोहचतील अशी अपेक्षा
होती. मात्र, या धोरणावर खुपच टीका झाली. पाम तेलासाठी जंगलतोड करावी लागते.
त्यामुळे ही माकडेच धोक्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मलेशिया
सरकारला आता हे धोरण मागे घ्यावे लागले आहे. याबदल्यात मलेशिया सरकारने नवे धोरण
आणले आहे. ते म्हणजे, पाम तेलाची खरेदी करणाऱ्या देशांना ओरंगुटान या माकडाचे
दायित्व (स्पॉन्सरशीप) दिले जाईल. याद्वारे त्या देशांकडून मलेशिया सरकारला पैसे
दिले जातील. हा निधी याच माकडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वापरण्याचे मलेशियन
सरकारने घोषित केले आहे. आता या धोरणाला प्रत्यक्षात किती प्रतिसाद मिळतो याकडे
सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मलेशियामध्ये ओरंगुटान या माकडांची
संख्या सव्वा लाखाहून अधिक असल्याचे सांगितले जाते. जंगलांचे संरक्षण करणे,
ओरंगुटान माकडांचे संवर्धन करणे आणि देशाचा व्यापार वाढविणे या त्रिसुत्रीवर आम्ही
भर देत आहोत. त्यामुळेच ओरंगुटान माकडांना पाम तेल खरेदी करणाऱ्या देशांना भेट
देण्याऐवजी दत्तक देऊ. त्यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या निधीद्वारे आम्ही देशातील
जंगल आणि ओरंगुटान यांचे संरक्षण करु. आमच्या या प्रस्तावाला नक्कीच मोठा प्रतिसाल
लाभेल, अशी खात्री आम्हाला आहे, असे मलेशियाचे पर्यावरण मंत्री जोहरी घनी यांनी
म्हटले आहे. मलेशियाच्या या नव्या धोरणाचे पर्यावरण, प्राणी आणि वन्यजीव प्रेमींनी
स्वागत केले आहे. तसेच, हा निधी खरोखरच माकडांच्या संरक्षणासाठी वापरावा, त्यात
पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भारताने अफ्रिकेतून चित्ते आणले आहेत. मध्य प्रदेशच्या जंगलांमध्ये हे चित्ते सध्या नांदत आहेत. काही चित्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रकल्प वादात सापडला. मात्र, काही काळ गेल्यानंतरच त्याचे यशापयश दिसून येणार आहे. परराष्ट्र धोरणात दुर्मिळ स्वरुपाच्या पक्षी आणि प्राण्यांच्या आदान-प्रदानातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे सदभाग्य दोन्ही देशांना लाभू शकते. अशा प्रकारचे प्रयत्न वैश्विक पातळीवर अनेक देशादेशांमध्ये व्हावेत, अशी मनोकामना पर्यावरणप्रेमी बाळगून आहेत. इतिहासात डोकावले तर विविध देशांनी त्याचा अवलंब केला आहे. काळानुरुप बदल स्वीकारत त्या त्या देशांनी परराष्ट्र धोरणाची आखणी करणे अपेक्षित आहे. पर्यावरणासारख्या जिव्हाळ्याच्या क्षेत्राची या धोरणात मदत घेणे हे चाणाक्ष, धूर्त आणि दूरदृष्टीचे द्योतक आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348
International, Malaysia orangutan, Monkey, Foreign, Diplomacy, Animals, Environment, China, Panda, Palm, Oil
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा